Sunday, September 27, 2009

उत्तेजनार्थ...!

'अभिनंदन साप्ताहिक सकाळ मधल्या बक्षिसाबद्दल!' मेसेज मोबाइलवर झळकला आणि मी चकीत झाले. मला बक्षिस मिळाल्याचं मलाच माहीत नाही? मी मित्राला फोन केला त्याने सांगितले की साप्ताहिक सकाळच्या कथास्पर्धेत तुझ्या एक होती वैदेही ला बक्षिस मिळालंय. मला तोवर माहीतीच नव्हतं.
मग मित्राने वाचून दाखवलं. बक्षिस उत्तेजनार्थ आहे हे ही कळलं.

दोन वर्षांपूर्वी माझ्या 'मी आणि नवा पाऊस' ला पहिल्या पाचात स्थान मिळालं होतं. त्यावेळेला सप्टेंबरच्या मध्यात मला साप्ताहिक सकाळच्या हपिसातून फोन आला होता. फोटो आणि माहीतीसाठी तसेच बक्षिस समारंभाचं आमंत्रण करण्यासाठी. तो काही यावर्षी आला नाही तेव्हा मी आपलं मला केळं मिळालं असं समजून चालले होते. आणि अचानक आज कळलं अगदीच केळं नाही तर निदान उत्तेजनार्थ बक्षिस मिळालं.

असो तर बातमी ही की माझ्या कथेला उत्तेजनार्थ का होईना बक्षिस मिळालंय. ब्लॉगवर पिडीएफ कशी चढवायची हे शिकले की त्या कथेची ही लिंक इथे टाकेन. साप्ताहिक सकाळच्या आज प्रसिद्ध झालेल्या कथा विशेषांकात माझी कथा छापलेली नाहीये पण पुढच्या एक दोन अंकांमधे ती छापली जाणार आहे.

उत्तेजनार्थ का होईना १२००-१५०० च्या गठ्ठ्यातून आपण १० मधे आलो हे काही छोटं प्रकरण नाही अशी स्वतःचीच पाठ थोपटत मी फेसबुकमधे स्टेटस अपडेट करायला गेले. उत्तेजनार्थ बक्षिसाचं भाषांतर Consolation Prize असं लिहिलं आणि मी थबकले.

हे Consolation Prize म्हणजे सांत्वनार्थ दिलेलं बक्षिस आहे? मला अचानक बिचारं वाटलं. बक्षिस न मिळाल्याने मी रडतेय असं चित्र आलं समोर. छोटीशी, मूर्तीमंत बावळटपणा असलेली, हुजूरपागेच्या पाचवी अ मधली, दोन वेण्या त्याही रिबिनीने वर बांधलेल्या अशी नीरजा बक्षिस न मिळाल्याने रडून रडून सुकलीये आणि मग तिचं सांत्वन करायचं म्हणून गोळी चॉकलेटासारखं 'घे बाळा तुला पण बक्षिस..' असं म्हणत Consolation Prize कुणी देतंय असं वाटलं. असं रडू रडू करून मला नकोच ते Consolation Prize असं वाटलं. राग आला साप्ताहिक सकाळ वाल्यांचा. मी काय रडायला नव्हते बसले ना बक्षिस दिलं नाहीत म्हणून मग? हे दया येऊन दिलेलं बक्षिस का? असे अचाट स्वाभिमानी डायलॉग्ज मी मनातल्या मनात मारले.

पण मग परत मायमराठीतला मजकुर आठवला. तिथे माझं बक्षिस उत्तेजनार्थ होतं. 'तू बरं लिहितेस गं पण काय करणार बाकीच्यांच्या कथा तुझ्या पेक्षा खूप चांगल्या होत्या. तुझी कथा पहिल्या पाचात नाही येऊ शकली. पण म्हणून निराश व्हायची गरज नाही. तू अजून चांगलं लिहावंस. अजून चांगला प्रयत्न करावास म्हणून तुला उत्तेजनार्थ बक्षिस देतोय आम्ही' असं म्हणणारं उत्तेजनार्थ बक्षिस. तेव्हा पहिल्या पाचात आलीस म्हणजे कायमच येशील असं नाही असा गर्वाचा फुगा फोडणारं, आता लिही परत पहिल्या पाचांपेक्षा जास्त चांगलं असं आवाहन करणारं उत्तेजनार्थ बक्षिस.

दहाच मिनिटात या बक्षिसाने केवढं शिक्षण केलं माझं. आणि माझं नशीब हे की हे समजायची अक्कल परमेश्वरानी माझ्या डोक्यात घातली.

तेव्हा आता त्या दिल्या अकलेला जागून तरी का होईना लिहिणे, लिहीत रहाणे क्रमप्राप्त आहे.
तेव्हा (भोगा आता आपल्या कर्माची फळं...) वाचा मी लिहिलेलं!!

-नी

माझा 'श्वास' - ४

आधीच्या एका प्रकरणात म्हणल्याप्रमाणे पटकथेच्या प्रक्रियेचा महत्वाचा भाग म्हणजे चित्रीकरण स्थळे शोधणे. त्याप्रमाणे संदीप पुणे परीसरात आणि कोकणातही फिरत होताच. सुरूवात कुठे झाली ते वर आलंच आहे. आत्तापर्यंत त्याने बघितलेल्या जागा पटकथेला आकार देत होत्या. व्यक्तिमत्व देत होत्या. पटकथा अधिक जिवंत व्हावी यासाठी मदत करत होत्या.

आता या अनेक जागांच्यातून प्रत्यक्ष चित्रीकरणाची स्थळे नक्की करायची होती. त्यांचे तपशील जमवायचे होते. त्यांच्या कानाकोपर्‍यासकट. पटकथेचा पोत, व्यक्तिरेखांचं अस्सलपण दिसण्यात अधोरेखित करणार्‍या जागा आता नक्की करायच्या होत्या.

आतापर्यंत पटकथेतील किंवा दिग्दर्शकाच्या डोक्यात असलेली चित्रपटाची दृश्य संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीची प्रक्रिया आता सुरू होत होती. चित्रपटाची दृश्य संकल्पना म्हणजे संपूर्ण चित्रपट कसा दिसणार आहे, चित्राचे रंग, पोत, त्यातल्या रेषा कश्या कश्या असणार आहेत, त्यात कश्या कश्या तर्‍हेने काय स्वरूपाचे दृश्यबदल होणार आहेत याचा एक आराखडा. यातील बदल हा केवळ स्थळबदलापुरताच अपेक्षित नाही. सगळ्या दिसण्यातून येणारा, निर्माण होणारा अनुभव महत्वाचा आहे. त्यामुळे नदीचा तीर म्हणला की नदीच्या पाण्याचा रंग (सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी), नदीचं वळण, तीरावरची झाडी, त्यांची हिरवाई, गवताचे रंग, मातीचा किंवा वाळूचा पोत हे सगळं सगळं बारकाईने समजून घेऊन आपल्या आत उतरवावं लागतं. इथे visual designer चं काम सुरू होतं. दिग्दर्शकाच्या डोक्यात या सगळ्या गोष्टींचा उत्तम अंदाज होता. आणि याबाबतीतला उरला हातभार द्यायला छायालेखक संजय मेमाणे होता आणि मीही होतेच.

दिग्दर्शकाची पटकथेची, व्यक्तिरेखांची व दृश्याची हाताळणी हे सगळं समजावून घेतल्याशिवाय दिग्दर्शकाच्या कल्पनेतलं दृश्य आमच्या कल्पनेशी मेळ खाणार नव्हतं त्यामुळे कोकण फिरताना दिग्दर्शकीय संकल्पना आपल्या आत उतरवणे हे महत्वाचंच. अर्थात माझ्या सुदैवाने बरेच आधिपासुन मी हे करतच होते. दिग्दर्शकाला सगळाच धुंडाळत होते तेव्हा हाताला लागलेल्या बर्‍याच गोष्टींबरोबर हे सगळे होतेच.

पहिली लोकेशन बघण्याची ट्रिप कधी झाली ते मी आधी सांगितलंच आहे. नंतर मात्र आम्ही खरोखरच लोकेशन शोधण्यासाठी, अभ्यासासाठीच कोकणात, सिंधुदुर्गात फिरलो.

प्रत्येक जागेचे तपशील गोळा करण्याची पद्धत तशीच. जाउ त्या प्रत्येक ठिकाणी होकायंत्र ठेवून सगळ्या दिशा, सुर्यप्रकाशाच्या दिशा, झाडे, डोंगरकडे, समुद्राचा किनारा इत्यादी इत्यादी लिहून किंवा चित्र काढून ठेवायचं. फेब्रुवारी मार्चच्या सुमारास शूट होणार त्यामुळे त्यावेळेला तीच जागा कशी असेल याचा अंदाज घ्यायचा. अश्या सगळ्या अगदी मूलभूत गोष्टी करतच होतो पण त्याआधी मुळात कोकणातली दृश्ये म्हणजे फोनच्या दृश्यातले कटस आणि शेवट सोडला तर सगळा आठवणीतला मामला आहे. तेव्हा आजोबा आणि परश्याच्या भावविश्वाशी निगडीत सगळ्या जागा हव्यात. आणि दृश्य त्या त्या वेळेच्या मनस्थितीत परश्या किंवा आजोबांना जे आठवू शकेल त्याच्याशी संबंधित हवे. कथेला, कथेतल्या परिस्थितीला, अनुभवाला अधोरेखित करणारे हवे. हा सगळा तोल सांभाळत सगळा भाग अभ्यासायला लागलो. एका ६ वर्षाच्या मुलासाठी कोकणातल्या छोट्या गावातलं खाउन पिउन सुखी आयुष्य कसं कसं असेल, त्याच्या जगात कोण कोण आणि काय काय असेल ह्याचा अंदाज घेणं हेही सुरू केलं. ही प्रक्रीया दोन बाजूंनी होत होती. संदीपने परश्याबद्दल त्याच्या कुटुंबाबद्दल मोजके संदर्भ दिले होते. त्या संदर्भाशी मिळणार्‍या व्यक्तिरेखा दिसतायत का शोधणं आणि संदीपने दिलेल्या संदर्भातून ती व्यक्तिरेखा आपल्या डोक्यात उभी करत जाणं. दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून होत्याही आणि नाहीही पण कोकणातली स्थळं(चित्रीकरणासाठीच!) शोधतानाच व्यक्तिरेखांचा अभ्यास चांगला होत होता.

परश्याच्या घरात आधुनिक वस्तुंची समृद्धी आणि चकचकाट नसणार होता पण अठरा विश्वे दारीद्र्यही नसणार होतं. अचानक चार माणसं आली तर आमटीभाताला घर महाग असणार नव्हतं. उन्हातून ताबडत आलेल्या अनोळखी पाहुण्याला पटकन झाडावरून उतरवून गार शहाळं देण्याची वृत्ती आणि सुबत्ता दोन्हीही परश्याच्या घरात असणार होती. अनोळखी पाहुण्याला आपलसं करेल असं प्रसन्न अंगण आणि उघडं दार असणार होतं. आणि अश्या घरात रहाणारे लोक हे परश्या, आजोबा, परश्याचे आईवडील असणार होते.

मुंबई गोवा महामार्गावर कुडाळच्या आधी काही किलोमीटर ओरोस म्हणून एक गाव लागतं तिथे राजधानी नावाचं हॉटेल आहे. राजधानीचे आनंद डिचोलकर हे संपुर्ण सिंधुदुर्ग फिरलेले आहेत. निवतीचा किल्ला, भोगव्याचा समुद्रकिनारा या काही गोष्टी त्यांच्याच पोतडीतून आम्हाला कळलेल्या.

सकाळी ८ पर्यंत ओरोसचं राजधानी सोडायचं आणि कुडाळ, मालवण व वेंगुर्ले या पट्ट्यातला एकेक भाग बघत बघत जायचा आणि रात्री ९ - १० पर्यंत कधीतरी परत यायचं असा या ट्रिप्सचा दिनक्रम असायचा. आधीच्या पाटीपासून पुढच्या पाटीपर्यंतचे किलोमीटर, कुठला फाटा कुठून कुठे किती अंतरावर आहे इत्यादी सगळं लिहून ठेवत परश्याचं घर शोधत जायचं. परश्याचं शेत, परश्या मुंबईहून परत येईल तो नदीकाठ सगळं सगळं शोधत फिरायचं. आपल्या संकल्पनेच्या जवळचं काही दिसलं की गाडीतून उतरायचं आणि कुण्या अनोळख्याच्या अंगणात जाऊन त्यांच्याच घराची पहाणी करायची. कुणी विचारलं तर सगळा पाढा वाचायचा.... का, कशासाठी इत्यादी इत्यादी. मग कुणी अगत्याने गुळपाणी देत नाहीतर कंटाळल्या चेहर्‍याने माना डोलावूनच हो नाही म्हणत. एखाद्याचं घर लांबून छान वाटे पण अंगणात गेल्यावर संदीपचा चेहरा नकार देताना दिसे. असं करत करत सगळा परीसर पिंजून काढत होतो.

असं करता करता सिंधुदुर्गातला एकेक खजिना समोर येत होता. कोकण समजत होतं. तिथला माणूस, त्याच्या जिव्हाळ्याच्या जागा त्याही समजत होत्या.

फिरता फिरता एक दिवस गाडीने पाट(हे गावाचे नाव आहे!) सोडले आणि थोड्यावेळाने परुळ्यामधे प्रवेश केला. आज पाट परुळे हाच पट्टा होता. उजव्या बाजुला डोंगर असल्याने तिकडे काही घरं सापडणार नव्हतीच. डाव्या बाजुला दरी होती त्यामुळे इथे काय असणार अश्या विचारात होतो तेवढ्यात डावीकडे रस्त्यापासुन थोडं खोल काहीतरी सुंदर दिसलं. खरंच दिसलं की भास म्हणून ड्रायव्हर ला गाडी मागे घ्यायला सांगितली आणि गाडी थांबवून पाह्यलं. एक हसरं अंगण, कौलारू घर आणि पांढरा चाफा आमच्याकडे बघून खुदखुदत होता.

हेच ते घर आणि चाफा. पण ही फ्रेम चित्रपटातली आहे. त्यामुळे आस्पेक्ट रेश्यो सिनेमास्कोप आहे. १:२.३५ असा.

Saturday, September 26, 2009

गणपतिबाप्पा मोरया!




गणपति विसर्जनानंतर ४-५ दिवसांनी ४ गणपति आपल्या विरघळण्याची वाट बघताना दिसले. पैकी एकाने आडवे होण्यापर्यंत मजल गाठली होती. अंगावरचे सोनेरी सोडून सगळे रंग सोडून गेले होते. एकाच्या हातांचे तपशील संपले होते.
स्थळः आरोंदा गावातील एक वहाळ.
कॅमेरा तपशील - निकॉन कूलपिक्स L 15, ऑटोवर काढलाय.

स्कार्लेट

मार्गारेट मिशेल च्या Gone with the wind ची नायिक Scarlet o’Hara. काल्पनिक असली तरी कुठल्याही खर्‍या माणसाइतकीच किंबहुना जास्तच माणूस वाटणारी हे स्कार्लेट.

मला मात्र ही सुरुवातीला भेटली लिंडा गुडमनच्या 'सन साइन्स' मधून. हसू नका प्रत्येकाने हे पुस्तक एकदा तरी वाचलेय नक्कीच आपापल्या टिनेज इयर्स मधे. तर ह्या पुस्तकात लिंडा बाई म्हणतात ”Scarlett O’Hara is the very epitome of the Mars-ruled Aries female.” आणि हे पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणे देतात. सन साइन्स प्रमाणे मी ही एरिस असल्याने कोण ही स्कार्लेट असे कुतुहल निर्माण झाले. Gone with the wind ठरवून पाह्यला न कंटाळता. तरीही स्कार्लेट तितकिशी समजली नाही पण ’I will never be hungry again!’ हे स्वतःच स्वतःला दिलेले वचन मात्र लक्षात राह्यले. मग एक चाळाच लागला अयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी स्कार्लेट शी ताडून बघायचा जो आजतागायत चालू आहे. साम्य किती नी कुठे हा मुद्दा दुय्यम पण यातून झाले मात्र एक की स्कार्लेट उलगडत गेली. मैत्रिण बनली.

ही स्कार्लेट मुळात अमेरीकेच्या जुन्या गर्भश्रीमंत अश्या दक्षिणेतली southern belle. अतिशय मनस्वी आणि हट्टी मुलगी. वयाच्या १६व्या वर्षापर्यंत 'lady like' वागण्यासाठी असलेली बंधने हे एकमेव दु:ख असलेली, एका मुलाच्या प्रेमातही पडलेली, त्याला मिळवण्यासाठी काहीही करू शकणारी, अगदी 'reputation' ही त्याच्यापुढे महत्वाचे न समजणारी. पण काय करता त्याने, म्हणजे अ‍ॅशली ने तर मेलनीशी लग्न ठरवलेले असते. निराश स्कार्लेट रागाच्या भरात एका वेगळ्याच तरूणाला लग्नाला होकार देते. लग्न होतं. हा काळ अमेरीकेतील उत्तर व दक्षिणेत झालेल्या Civil war चा आहे. सगळेच तरूण Confederate Army मधे गेले आहेत. त्यात तिचा नवराही. तो युद्धावर कामी येतो. त्याच्या शोकाचे काळे कपडे घालताना तिला एवढेच वाटत असते 'I am too young to be a widow!' लवकरच तिला ज्याच्यावर कधीच प्रेम केले नाही अश्या नवर्‍याच्या मृत्युप्रित्यर्थ कराव्या लागणार्‍या शोकाचा किंवा त्या देखाव्याचा कंटाळा येतो. Charity Ball च्या वेळेस काळा स्कर्ट आणि सफ़ेद क्रिनोलाइन नि त्याच्या खाली नुसतेच नाचणारे पाय हे दृश्य सगळ्यांना आठवतच असेल. ती काळे कपडे टाकून देते. र्‍हेट बटलर तिला समजावतो की तिने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. इथे तिचा कणखर आणि मनस्वी स्वभाव जास्त ठळकपणे जाणवायला लागतो

युद्धाची तीव्रता वाढत जाते. Old south चा सगळा डोलारा कोलमडून पडायची वेळ येते. स्कार्लेट या ठिकाणी युद्धातील जखमींची शुश्रुषा करणार्‍या नर्सच्या रूपात दिसते. केवळ अ‍ॅशली ला दिलेले वचन पाळण्यासाठी ती मेलनीचे बाळंतपणही करते अगदी एकटीने. युद्धात Confederate Army चा पराजय होतो. स्वतःच्या नि उरलेल्या सगळ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्कार्लेट आपल्या शिरावर घेते एखाद्या कर्त्या पुरुषाप्रमणे. ह्याच वेळी ती स्वत:ला ते वचन देते

”As God is my witness, as God is my witness, they're not going to lick me! I'm going to live through this, and when it's all over, I'll never be hungry again - no, nor any of my folks! If I have to lie, steal, cheat, or kill! As God is my witness, I'll never be hungry again.”
(देवाला साक्षी मानून मी स्वतःलाच वचन देते की मी यातून तावून सुलाखून बाहेर पडेन आणि मग सगळा गोंधळ संपल्यावर मात्र मी कधीच उपाशी रहाणार नाही, मी नाही आणि माझी माणसंही कधी उपाशी रहाणार नाहीत. मला मग त्यासाठी खोटं बोलावं लागलं, फसवावं लागलं, कुणाला मारावं लागलं तरी चालेल पण देवाशपथ मी कधीही उपाशी रहाणार नाही!)
जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशा याचे याहून मोठे उदाहरण कुठले? मला खात्री आहे की प्रत्येक झोपडीतल्या बाई मधे हेच म्हणणारी स्कार्लेट असते. खरेतर प्रत्येक जणातच ही अशी स्कार्लेट दडलेली असते का?

ह्यानंतर आपली जमीन वाचवण्यासाठी फ्रँक केनेडीशी स्कार्लेट लग्न करते. जो खरंतर तिच्या धाकट्या बहिणीचा प्रियकर असतो. हे स्कार्लेटला माहित असते पण हेही माहित असते की जर सगळ्यांचेच देशोधडीला लागणे टाळायचे असेल तर हे करणे जरूरीचे आहे. हळूहळू त्यांना बरे दिवस येऊ लागतात. पण युद्धामुळे ढवळून निघालेला समाज अजून स्थिर नाहीये. अराजकाची स्थिती, लूटमार चालू आहे. अश्यातच स्कार्लेटवर हल्ला होतो. स्कार्लेट वर झालेल्या हल्ल्याचा सूड घ्यायला म्हणून अ‍ॅशली आणि फ्रँक जातात आणि त्या धामधुमीत फ्रँक मारला जातो. ती परत एकदा विधवा होते. याच वेळेला तिला तिच्या आईची तीव्रतेने आठवण येते आणि ती हेही कबूल करते की तिला तिच्या आइसारखेच व्हायचे होते. मृदु आणि दयाळू. पण ती कबूल करते की ती जे काही आहे ती मृदु नि दयाळू यापासून शेकडो योजने दूर आहे.
र्‍हेट तिच्यावरच्या आपल्या प्रेमाचा पुनरुच्चार करतो. पूर्णपणे प्रेमासाठी नाही तरी पैशासाठी ति त्याच्याशी लग्न करते. एव्हाना तिला अ‍ॅशली आपला होणे नाही हे मात्र पटलेले असते. र्‍हेट आणि स्कार्लेटला एक मुलगी होते पण तीही त्या दोघांना जवळ आणण्यात अयशस्वी होते. र्‍हेटचा संयम संपत जातो. अश्यातच बॉनीचा त्यांच्या मुलिचा अपघाती मृत्यू होतो आणि र्‍हेटच्या दृष्टीने तुकडा पडतो.
मेलनीचाही मृत्यू होतो आणि त्यावेळेला अ‍ॅशली चा विलाप पाहून स्कार्लेटला हे वास्तव लक्षात येते की ह्याचे आपल्यावर कधीही प्रेम नव्हते आणि तिला हेही जाणवते की ते तसे नव्हते याचे आपल्याला काहीच वाटत नाहीये.
तिला र्‍हेटची आठवण येते. त्याच्याबद्दल प्रचंड ओढ दाटून येते आणि याच वेळेला तो तिला सोडून निघालेला असतो. त्याचे मन तिच्या प्रेमाची वाट बघायला विटलेले असते त्यामुळे तिच्या कुठल्याच विनवणीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. ”Frankly, my dear! I dont give a damn!”(खरं सांगायचं तर मला काहीही फरक पडत नाही!) असा घाव घालून तो निघून जातो.
पण स्कार्लेट ला हरणे मान्य नाहीये. तिने ज्याच्यावर आयुष्यभर प्रेम केले ते खोटे ठरलेले आहे, ज्याच्यावर तिचे खरे प्रेम आहे असा तिचा नवरा तिला सोडून गेलेला आहे, तिची मुलगी ही गेलेली आहे. अश्या अवस्थेलाही ती पराजय मानत नाही. ती आपल्या पहिल्या घरी जाण्याचे ठरवते.
”...Tara!...Home. I'll go home, and I'll think of some way to get him back! After all, tomorrow is another day!” (टेरा.. माझं घर.. मी घरी जाइन आणि त्याला [र्‍हेटला] परत मिळवण्यासाठी प्रयत्न करीन. शेवटी उद्याचा दिवस वेगळाच असणारे ना!)
स्कार्लेट स्वार्थी, मानी पण कुठल्याही गोष्टीच्या डोळ्याला डोळा भिडवून जे आहे ते आहे, नाही ते नाही असं सांगू शकणारी अशी, एक खरिखुरी माणूस. प्रत्येक चांगल्या वाइट गोष्टींसकट. प्रत्येक संकटाला, दुर्दैवाला '|Tomorrow is another day!’ म्हणून ठेंगा दाखवणारी प्रचंड आशावादी. तापट आणि कणखर पण त्याच वेळेला एखाद्या निरागस बाळाप्रमणे वाटणारी . प्रेमासाठी सगळे ओवाळून टाकले तरी प्रेमापेक्षाही इतर अनेक महत्वाच्या गोष्टी जगात असतात यावर विश्वास ठेवणारी. र्‍हेटशी लग्न करून आपण आपल्याहून वरचढ माणसाला स्थैर्यासाठी विकले, बांधले गेलो आहोत कि काय अशी भिती बाळगणारी एक मुक्त आणि स्वच्छंदी जीव, Free spirit.
आजही ही स्कार्लेट माझ्या मनात प्रत्येक वेळी Tomorrow is another day म्हणत रहते. सतत भेटत राहते. नि आजही तिच्याशी मला ताडून बघण्याचा माझा चाळा सुटलेला नाही.

-नी

Friday, September 25, 2009

माझा 'श्वास' - ३

आजूबाजूला बर्‍याच मालिकांमधून किंवा काही चित्रपटांच्यात बरीच लहान मुले होती पण कोकणातल्या खेड्यातला मुलगा काही सापडत नव्हता. सगळी मुलं एकजात शहरी वळणाची. आणि वर इंग्रजी माध्यमातली होती.

आम्ही शोधत होतो. चारी दिशांना दूत पाठवले होते म्हणजे सगळ्यांना सांगून ठेवलं होतं. मुलगा ६-७ वर्षांचच हवाय हे स्पष्ट कळवूनही चित्रपटाच्या मोहाने आपल्या १०-१२ वर्षाच्या बाब्यालाही "लहानच दिसतो हो तो" म्हणत आम्हाला भेटायला येणार्‍या आया पाहिल्यावर त्या मुलाची दयाच येत असे.

अश्यात एकदा माझ्या आईने एक फोटो दिला आम्हाला बघायला. ती एका मंगळागौरीच्या कार्यक्रमाला गेली होती तिथे एका चुणचुणीत छोट्याने एक नाट्यछटा केली होती. त्याचा फोटो आईने मागून घेतला होता. तो हा फोटो होता. फोटोतल्या cartoon चे गमतीशीर डोळे, त्याचा सावळा रंग आणि कपाळावरचे केसांचे मजेशीर छप्पर हे पाहून आम्ही दोघेही खुश झालो.



त्याच्या घरी पोचलो. लाल शर्ट आणि काळी चड्डी अश्याच वेषात साहेब आमच्यासमोर हजर झाले. समोरच्या दिवाणावर तो आणि त्याची आई बसली होती. इकडे खुर्च्यांवर आम्ही दोघं. संदीपने त्याच्याशी गप्पा मारायला सुरूवात केली. संदीपच्या हातात व्हिडीओ कॅमेरा होता. तो हळूच त्याने चालूही केला. ज्यूनियर चितळे आपल्याला भेटायला कुणीतरी आलंय म्हणून जाम खुश होते आणि किंचित लाजतही होते. संदीपच्या हातातल्या कॅमेर्‍याकडे त्याचं वारंवार लक्ष जात होतं. संदीप त्याला, "इकडे ये!" म्हणाला, समोरचा दिवाण ते संदीप बसला होता ती खुर्ची यातलं अंतर ५ - ६ पावलं असेल नसेल पण जवळजवळ मॅरेथॉन मधे धावावं एवढ्या वेगात त्याने धाव घेतली आणि पटकन संदीपच्या जवळ आला. आजही माझ्या डोळ्यासमोरून त्याची ती धाव हटत नाही. संदीपला आणि मला जाम हसायला आलं. साधारण दीड मिनिटात त्याचा बुजरेपणा संपला होता आणि तो आमच्याशी गप्पा मारायला लागला होता. नंतर त्याला त्याचं नाव आणि त्याच्याबद्दल २ ओळी बोलायला सांगितल्या कॅमेर्‍यात बघून. "माझे नाव अश्विन मिलिंद चितळे आहे. माझे वय ६ वर्ष आहे. नुकतीच माझी मुंज झाली. तेव्हा मला खूप मजा आली." अशी वाक्य म्हणताना हळूच एकीकडे हसू न आवरणं, हसण्याच्या नादात शब्दांची गडबड करणं, त्यावरून जीभ बाहेर काढून किंवा मानेनेच 'नाही' म्हणून वाक्याची परत सुरूवात करणं, आणि यामुळे त्याला अजूनच हसायला येणं असं त्याचं चालू होतं. 'तू टीव्ही बघतोस का? काय आवडतं? मारामारी करायला आवडते का?' असं काय काय संदीपने त्याला विचारलं. मारामारीचं नाव काढल्यावर स्वारी खूशच. संदीपने त्याला माझ्याशी मारामारी करायला सांगितली. हे सगळं संदीपच्याकडे टेप होत होतं आणि हे त्या पिल्लाला विसरायला झालं होतं एव्हाना. मी तर तेव्हाच खुश झाले होते. हाच 'तो' अशी माझी खात्री पटली होती. आणि संदीप अर्थातच इतक्या पटकन खुश होणार्‍यातला नसल्याने "चांगला आहे. शक्यता आहे हाच ठरण्याची. पण अजून screentests कराव्या लागतील" असं म्हणून आम्ही चितळ्यांच्या घरून बाहेर पडलो.

यानंतर संदीपने अश्विनशी छान मैत्री वाढवली. त्याला घरी जाऊन भेटणे, त्याला बाहेर खेळायला घेऊन जाणे इत्यादी सुरू झाले. त्याच्याशी संदीपने खूप गप्पा मारल्या. अगदी आज शाळेत काय झालं पासून काल आईने फटका दिला होता इथपर्यंत सगळं तो संदीपला सांगू लागला. अश्विन संदीपच्याबरोबर खूपच रूळला, comfortable झाला. हळू हळू संदीपलाही १००% खात्री पटली की हाच 'परश्या' आणि मग त्याचे ट्रेनिंग चालू झाले. साधारण चारपाच महिने हे ट्रेनिंग चालू होते.

ह्यातच मग हळूहळू 'परश्या' साकारण्यासाठी म्हणून विशिष्ठ inputs द्यायला संदीपने सुरूवात केली. 'तुला काय वाटतं काय करायला हवं आता परश्यानं? किंवा असं झालं तर तुला कसं वाटेल?' अश्या साध्या साध्या संवादांच्यातून संपूर्ण पटकथा गप्पा मारत मारत, चर्चा करत, हळू हळू संदीपने अश्विनपर्यंत पोचवली.

पटकथेच्या अनुषंगाने येणार्‍या ठिकाणी विशेषतः हॉस्पिटलमधे, डॉक्टरांच्या क्लिनिकमधे त्याला फिरवूनही आणले होते. अगदी मेल सर्जिकल वॉर्ड पासून ऑपरेशन थिएटर पर्यंत. हेतू हा की त्याला या सगळ्या वातावरणाची सवय व्हावी. पहिल्यांदा त्याला तिथे घेऊन गेलो होतो तेव्हा आम्हालाच तो घाबरेल का? रडेल का अशी थोडी भिती होती. पण एव्हाना आमच्या दोघांची विशेषतः संदीपकाकाची त्याला इतकी सवय झाली होती की तो कणभरही घाबरला नाही. मजेत होता. अगदी हॉस्पिटलमधे स्ट्रेचर वर झोपवून त्याला OT मधे नेऊन आणले तेव्हाही. वर स्पिरिटचा वास मला खूप आवडतो असंही सांगितलं त्याने.

अस सर्वच दृष्टीने त्याला 'परश्या' करण्यासाठी तयार करणं चालू होतं. पण सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे अश्विनला या सगळ्याचा त्रास न होणं. वय लहान आणि कर्करोग, आंधळं होणं या गोष्टी नट म्हणून अंगावर घेताना त्याच्या मनावर आयुष्यभरासाठी 'स्कार' होणं ही शक्यता खूपच होती. आणि त्याचा परिणाम film मधल्या performance वर होण्याची शक्यताही होती. त्यामुळे पहिल्यापासून त्याला हे सगळं खोटं आहे. ही एक गोष्ट आहे आणि ती एकदम खरी वाटेल अशी आपल्याला दाखवायचीये हे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने संदीपने समजावून दिलं. म्हणजे कसं की..

"आजारी कोण आहे?"
"परश्या"
"लोकांना कळलं पाहीजे तो आजारी आहे. परश्या कोण करतंय?"
"अश्विन"
"मग अश्विन बरं नाहीये असा दिसला तर लोकांना कळेल ना परश्या आजारी आहे ते.."

अश्या गप्पांच्यातून परश्या आणि अश्विन हि सीमारेखा संदीपने कायम ठेवली. त्यामुळे पुढे शूटींगच्यावेळेला अत्यंत intense scenes च्या वेळेलासुद्धा अश्विन एकदम relax असायचा.

नेहमी भेट झाल्यावर काय काय झालं, संदीपकाका काय काय बोलला असं सगळं त्याला लिहून ठेवायला संदीपने सांगितलं होतं. कधी कधी संदीप त्याला प्रश्नही द्यायचा ज्याच्याबद्दल पुढच्या वेळेपर्यंत त्याने लिहून आणणं अपेक्षित असायचं. हे प्रश्न म्हणजे 'मग आता परश्यचं काय झालं? आजचा गोष्टीतला जो भाग होता त्याबद्दल तुला काय वाटतं? आज आपण अमुक अमुक ठिकाणी गेलो होतो तिथे तुला कसं वाटलं?' विविध स्वरूपाचे असायचे. वय वर्ष सहा, इयत्ता दुसरी या वयाला साजेसं, जमेलसं तो त्यात लिहायचा. अर्थात तो काही अभ्यासू विद्यार्थी नव्हता ( thank god! ). कधी कधी कंटाळाही करायचा. कधी कधी वात्रटासारखं "मला झोप आली म्हणून आईला लिहायला सांगितलं." असं उत्तरही यायचं त्याच्याकडून किंवा एकदा वहीची दोन पानं मोठ्ठ्या अक्षरात 'काही नाही' असं लिहिलं होतं त्याने. मग संदीपकडून एखादी खरीखुरी किंवा शाब्दिक चापटही खायचा तो तेव्हा पण एकुणात त्याने पटकथा, परश्या हे सगळं पचवायला सुरूवात केली होती हे नक्की.

दूध जमा करून घेणारा माणूस



हा फोटो हुमरस (सिंधुदुर्ग) येथील एका दूध डेअरीचा आहे. वेळ पहाटे ५:३०-६ दरम्यानची. म्हणायला डेअरी असली तरी हे दुधाचे कलेक्शन सेंटर आहे. पहाटे ५:३० ला हा माणूस या टेबलावर येऊन बसतो. सगळी उपकरणी मांडून. दूध घेऊन आलेल्या लोकांच्या दुधातलं फॅट कन्टेन्ट मोजतो आणि दूध जमा करून घेतो. गेली २५ वर्ष तरी हा माणूस हे न चुकता रोज सकाळ संध्याकाळ दोन दोन तास करतो.

कॅमेरा तपशील - निकॉन कूलपिक्सचा L 15. पूर्णपणे ऑटो. फ्लॅश वापरलेला नाही. मागच्या पडवीमधे एक ट्यूबलाइट चालू होती तिचाच काय तो उजेड. मूळ फोटो हा रंगीत असला तरी पहाट असल्याने रंग फारसे डिफाइन्ड नाहीयेत. मूळ फोटो ब्लू मोनोक्रोमॅटीक दिसतो. फोटोशॉपमधे मोड चेन्ज करून ग्रेस्केल ला आणलाय आणि ब्राइटनेस व कॉन्ट्रास्ट किंचित वाढवला

Thursday, September 24, 2009

माझा श्वास्’ – २

लग्नानंतर आम्ही गेलो मालवणला. मालवणच्या आसपासचा परिसर फिरत होतो. धामापुरच देऊळ ओलांडून तिथून मग नेरूरपार कडे येऊन काळश्याला खाली उतरून वनलक्ष्मीच्या बोटीतून कर्ली नदीमधे फिरून आलो. फार मस्त होता तो भाग. मला आपलं नवीन लग्न झालेल्या मुलिला जसं वाटावं तसं छान छान वाटत होतं तिथे फिरताना आणि दिग्दर्शकाच्या डोक्यात वेगळीच चक्र चालू होती. सगळ्या परिसराची बैजवार माहिती घेऊन ठेवली. काळश्याचे केशव सावंत, वनलक्ष्मीची बोट चालवणारे कोरगावकर, त्या परीसरातली हिरवाई, उन्हाच्या दिशा इत्यादी इत्यादी. एकाच ठिकाणी २-३ वेळा जाऊन आलो आम्ही ६ दिवसांत आणि ही एवढी माहिती... परत ओळख झालेल्या रिक्षेवाल्याबरोबर त्याचे गाव, खोताचे जुवे, सुरुचे बन इत्यादी बघून येणे, तिथल्या परिसराचे फोटो काढणे, माणसांशी ओळखी करून घेणे.. इत्यादी इत्यादी इत्यादी. दिग्दर्शकाच्या उत्साहाची लागण मलाही झाली. त्या भरात तपशीलवार माहिती लिहून घेणे, हे गाव त्या’ मुलाचं म्हणून योग्य वाटेल की नाही इत्यादी चर्चा दिग्दर्शकाबरोबर करणे हे सर्व मीही केलं. पण मग अचानक मला आठवल आपण हनीमून ला आलोय आणि location hunting करतोय लग्नानंतरचे पहिले कडाक्याचे भांडण यावरून झाले. ते अजूनही अधून मधून वर येते पण आता location hunting नसलेला second HM दिग्दर्शकाने मला प्रॉमिस केलाय आणि मी वाट बघतेय!!

मुंबईत परत आलो आणि संदीपच्या पायाला परत भिंगरी लागली. डॉ. पुणतांबेकर व कॅन्सरशी संबंधित इतर व्यक्ती नी संस्थांना भेटणे. स्वतःच्या notes काढणे. पटकथेची बांधणी करणे. हे सगळं सुरू झालं. मुंबईत तो लिखाण करत होता तेव्हा रोज सकाळी आम्ही डबा घेऊन निघायचो आणि वडाळ्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊन बसायचो. रात्री ८ वाजता ग्रंथालय बंद व्हायचे. मग तेव्हा तिथून निघायचे आणि शिवाजी पार्क किंवा अजून कुठेतरी जाऊन कथेवर चर्चा किंवा कधी कॅमेर्‍याच्या movement बद्दल किंवा कधी general filmmaking मधला एखादा कुठला तरी मुद्दा घेऊन चर्चा करत असू. अजून माझा सहभाग चर्चेपुरताच जरी मर्यादीत असला तरी जे काही त्याच्या डोक्यात आकार घेतंय त्याच्या treatment ची थोडी कल्पना यायला लागली होती.

संशोधन हा कुठल्याही पटकथेचा महत्वाचा भाग असतो. इथे कथेची पार्श्वभूमी वैद्यकीय असल्याने त्या जगाबद्दल आतून समजून घेणे गरजेचे होते. फक्त कथेच्या अनुषंगाने येणारीच माणसे नाहीत तर त्या त्या जगातली सगळीच माणसे, त्यांचे आपसातले व्यवहार, त्यांची मानसिकता इत्यादी गोष्टी महत्वाच्या ठरतात. कथेतील महत्वाच्या आणि कमी महत्वाच्याही व्यक्तिरेखा ह्या त्यांच्या बारीक बारीक कंगोर्‍यांसकट खर्‍या वाटल्या पहिजेत. त्यांची प्रत्येक कृती तर्काला धरून असायला हवी. खरोखरिच माणूस वागेल तसे ते वागायला हवेत लेखकाने लिहिलय म्हणून नव्हे. प्रत्येक घटना ही आधीच्या घटनेनंतर सहजतेने येणारी वाटायला हवी. ह्यासाठी व्यक्तिरेखांचा तपशीलात अभ्यास करायची गरज होती. त्यासाठी संदीप डॉक्टर पुणतांबेकरांच्या बरोबर अक्षरश दिवसरात्र फिरत होता. स्वत डॉक्टर, त्यांचे असिस्टंटस, त्यांना भेटायला येणारे कॅन्सरच्या वेगवेगळ्या अवस्थेतले रूग्ण, सपोर्ट ग्रुप्स चालवणारे काउन्सेलर्स इत्यादी सगळ्यांना बघणे, भेटणे, सपोर्ट ग्रुप्स च्या मिटींग्ज अटेण्ड करणे, सिप्ला सेंटरमधील रूग्ण (सिप्ला सेंटर हे कॅन्सरच्या शेवटच्या स्थितील रूग्णांची काळजी घेणारे केंद्र आहे), त्यांचे नातेवाईक, तिथले डॉक्टर्स, सोशल वर्कर्स यांना भेटणे, बघणे अश्या अनेक पद्धतींनी संशोधन चालू होते.

पटकथेचा कच्चा आराखडा तयार होत आला आणि आता तपशील भरण्यासाठी, दृश्य अधिक जिवंत व्हावे यासाठी चित्रीकरणाच्या जागा निश्चित करणे गरजेचे होते. प्रत्येकाची लिहायची विशिष्ठ पद्धत असते. संदीप पटकथा लिहीत असताना मुंबईत एका जागी बसून लिहू शकत नाही. संशोधनामधे सगळ्या गोष्टींची माहिती करून घेण्याबरोबरच, घटना घडण्याचे अवकाश(स्पेसेस) शोधत जाणे, त्यातून त्या त्या अवकाशाचे आणि पर्यायाने घटनेचे कॅरेक्टर निश्चित करत जाणे हि प्रक्रिया संदीपसाठी गरजेची असते. हॉस्पिटल म्हटले की कुठलेही हॉस्पिटल किंवा नुसते पांढरे पडदे लावून चालत नाही. प्रत्येक घटना कुठे घडते यावर ती कशी कशी घडते हे अवलंबून असते. हे सगळे काम साधारण सप्टेंबर ऑक्टोबर २००२ च्या दरम्यान सुरु झाले. आणि त्या त्या ठिकाणाची तपशीलवार माहिती जमवणेही. यावेळेला मग संदीपबरोबर मीही वेगवेगळ्या हॉस्पिटल्सच्या फेर्‍या मारू लागले. लोकेशनची तपशीलवार माहिती म्हणजे प्रत्येक भागाचा बारीक बारीक गोष्टींसकट नकाशा किंवा चित्र काढणे. आत असेल तर दारे, खिडक्या, वस्तू आणि बाहेरची जागा असेल तर झाडे, कुंड्या, रस्ता सर्व काही. नैसर्गिक (खिडकीतून वा परावर्तित होऊन येणारा सूर्यप्रकाश) व कृत्रिम(वेगवेगळ्या प्रकारचे दिवे) अश्या प्रकाशाच्या sources ची माहिती लिहून ठेवणे. दिशांसकट हे सगळं टिपून ठेवायचं. बरोबर संदर्भासाठी फोटो जोडायचे. असा सगळा कार्यक्रम असायचा. दिवसातल्या आणि वर्षातल्या कुठल्या वेळेला ती ती जागा कशी कशी दिसेल याचा अंदाज येण्यास यातून मदत होते कारण अर्थातच सप्टेंबर मधे असलेली परिस्थिती फेब्रुवारि मधे रहाणार नव्हती. अर्थात ऋतुबदलाने बदळणारी परिस्थिती हे outdoor locations च्या बाबतीत जास्त महत्वाचे ठरते.

चित्रपटाच्या आर्थिक आधारासाठीही धडपडणे चालू होते. सुरूवातीला मिळालेला आधार हा संपूर्ण नसणार हे माहित होते त्यामुळे बाकीचा बराच मोठा भाग उभा करण्यासाठी यत्न चालू होते. अनेकांशी अरूण आणि संदीप बोलत होते. काहीजण पुढे येत होते आणि एकदोन मिटींग्ज नंतर गळत होते. अरूणच्या ओळखीतल्या एका हितचिंतकाने interest दाखवला. अनेक मिटींग्ज संदीपने केल्या त्यांच्याबरोबर आणि त्यांना ह्या project चे महत्व पटले, संदीपची passion लक्षात आली आणि त्यांनी उरलेली सगळीच आर्थिक अडचण दूर केली. ही घटना ३-४ ओळीत सांगितली असली तरी हे सगळे साधारण २००२ च्या जूनपासून डिसेंबरपर्यंत चालू होते.

असा सगळा माहौल हळूहळू तयार होत होता. याच्याबरोबर पात्रयोजनेतला सगळ्यात crucial भाग म्हणजे लहान मुलगा, त्याचा शोध चालू होता. तो मिळत नव्हता. त्यावेळेला आजूबाजूला दिसत असलेल्या बालकलाकारांच्यात कोणीच योग्य वाटत नव्हता.

-नी

Wednesday, September 23, 2009

माझा 'श्वास' – १

'श्वास' या चित्रपटाने २००४ मधली बहुतांश सर्व पारितोषिके, राष्ट्रीय पुरस्काराचं सुवर्ण कमळ मिळवून इतिहास घडवला. भारताकडून ऑस्करसाठी पाठवला गेलेला हा पहिला मराठी चित्रपट.
या चित्रपटाचा प्रवास मी खूप जवळून अनुभवला. वेशसंकल्पक या नात्याने तसेच इतर अनेक पातळ्यांवर माझे योगदानही दिले. हा माझा प्रवास मी शब्दबद्ध करतेय 'माझा श्वास' या लेखमालेत.
-------------------------------------------------------------------------------------
"आपल्याला इ-टीव्ही साठी एक टेलिफिल्म करून द्यायची आहे. स्पंदन या स्लॉटसाठी. त्या आंधळ्या मुलाच्या गोष्टीवर." एक दिवस संदीप ने सांगितले. ऑक्टोबर २००१ मधली गोष्ट ही. त्याआधी महिनाभर त्याने मला आंधळ्या मुलाची गोष्ट ऐकवली होती. तेव्हा मी नुकतीच परत आले होते भारतात आणि आता काम सुरू करायचे, चांगले कामच करायचे अश्या विचारात होते. होणार्‍या नवर्‍याबरोबर एकत्र काम करण्यासाठीही उत्सुक होते.

त्या गोष्टीतला विचार खूपच छान होता. आणि संदीप ज्या पद्धतीने तो विचार पुढे यावा यासाठी ती treat करू पहात होता ते खूपच interesting वाटत होते.

माधवी घारपुरे यांच्या काही कथा त्यांनी संदीपकडे वाचायला पाठवल्या होत्या. त्यातली संदीपला potential वाटलेली ही एकमेव गोष्ट. य गोष्टीत एक सच्चा आणि enriching अनुभव देण्याच्या शक्यता संदीपला जाणवल्या होत्या. मग संदीपने या गोष्टीबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा असं कळलं की पुण्यातले प्रसिद्ध कर्करोगतज्ञ व सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर हे त्यांच्या सुरूवातीच्या काळात जेव्हा मुंबईत टाटा’ मधे होते तेव्हाचा त्यांचा हा अनुभव आहे.

तर अश्या ह्या कथेवर आधारीत एक टेलिफिल्म करायची आहे. साधारण डिसेंबर मधे शूट असेल, असं संदीपने सांगितल. आणि लवकरच आम्हाला कळल की इ-टीव्ही ने तो स्लॉटच बंद केलाय. त्यामुळे आता ती टेलिफिल्म होणे नाही.

असंच होत होतं संदीपच्या बाबतीत दर वेळेला. हाती येतेय असे वाटतंय तोच समोरून काम निघून जावे असे प्रत्येक project मधे होत होते.

पण संदीपला मात्र या कथेने, यातल्या अनुभवाने घेरून टाकले होते. इतक्या सहजासहजी हे project सोडून द्यायला तो तयार नव्हता. त्यामुळे या कथेवर feature film करावी असे त्याच्या मनाने घेतले.

साधारण डिसेंबर २००१ च्या सुमारास अरूण (नलावडे) आणि संदीप यांच्यात बोलणे झाले की एखादी छोट्या बजेटची फिल्म असेल तर करता येण्यासाठी आर्थिक आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यावर संदीपने ही आंधळ्या मुलाची गोष्ट अरूणला सुचवली. दोघांचेही ही फिल्म करायची असे ठरले.

संदीप संशोधनाच्या कामाला लागला. डॉक्टरांचा मूळ अनुभव, कॅन्सर, हॉस्पिटल, लहान मुलाचे भावविश्व, तो गावाकडचा होता पण गाव कुठच हे ठरवणं… एवढ्या सगळ्या गोष्टींवर अगदी खोलात जाऊन संशोधन करायची गरज होती. 'तेवढं नाही केलं तर ते खरखुर कसं वाटणार. त्य कथावस्तुची dignity कशी पाळली जाणार? त्यामुळे ते करायलाच हवे' इतका साधा सोपा approach होता संदीपचा.

मार्च २००१ मधे आमची engagement झाली. ठरलं होतं आधीच फक्त घरच्यांसाठी सोपस्कार पार पडले. त्याच वेळेला या गोष्टीवरच्या फिल्म साठी चक्र जोरात फिरायला लागली होती.

संदीप दिवसचे दिवस पुण्यात येऊन रहात होता डॉ. शैलेश पुणतांबेकरांना भेटण्यासाठी. ते बिचारे पडले बिझी सर्जन आणि कर्करोगतज्ञ. पेशंटस, ऑपरेशन्स यातून एका सिनेमासाठी ते किती वेळ देऊ शकणार होते. त्यामुळे अनेकदा ठरलेल्या appointments cancel व्हायच्या. पण संदीप चिकाटीने थांबून रहायचा त्यांच्यासाठी. मला आठवतंय अशी कधी ठरलेली meeting cancel झाली की मी जाम चिडायचे, ‘ते असं कसं करू शकतात?’ म्हणून.. पण तोवर मला त्यांचे आयुष्य माहित नव्हते. आणि आता माहित झाल्यावर त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल फारच आदर वाटतो.

मे २००२ मधे आमचं लग्न झालं. या मधल्या वेळात संदीप त्या संशोधनात इतका गुरफटायला लागला होता की मला वाटल ह्याला लग्नासाठी दोन दिवस तरी काढता येणारेत की नाही! मग तेव्हढ्यात मलाही एक छोटं project मिळालं होतं मुंबईमधे त्यामुळे मी लग्नासाठी वेळेत पुण्यात पोचणार आहे की नाही अशी भिती मला वाटायला लागली. पण तस काही न होता आम्ही वेळेत पोचलो आणि लग्न झालं. लग्नाच्या आधी २-३ दिवस डॉक्टरांकडे संदीप गेला होता. त्यांनी त्याला सांगितले की 'असं कर आता २४ तारखेला तू ये. त्यादिवशी तुला अजून काही पेशंटस भेटतील.' संदीप हो’ म्हणता म्हणता थांबला (बहुतेक माझा चिडलेला चेहरा आठवून…) आणि म्हणाला, "२४ च्या ऐवजी नंतर थोडे दिवसांनी चालणार नाही का?" डॉक्टरांना कळेना याला काय झालं अचानक. त्यांनी विचारलं, "का?" "नाही एक छोटासा problem आहे. त्याच दिवशी माझं लग्न आहे, त्यामुळे जमणार नाही." (पण नसेल नंतर शक्य, तर मी येईन थोडा वेळ काढून.. हे वाक्य त्याने भितीनेच गिळले असावे..) डॉक्टर हसू लागले. "कृपया पुढचे १५ दिवस तरी येऊ नका इथे." असा दम दिला असावा त्यांनी कारण लग्नानंतर चक्क १०-१२ दिवस संदीप त्यांच्याकडे गेला नाही.

-नी

Tuesday, September 22, 2009

गुंडाळलेल्या कापडाची कहाणी!!

लहानपणापासून नव्वारी साडी म्हणजे काहीतरी प्रचंड अवघड, गूढ आणि एकदम खानदानी प्रकरण असावं असा एक समज बसला होता डोक्यात. माझी आजी काही नव्वारी नेसत नाही. पण नव्वारी नेसणार्‍या लांबच्या आज्या घरी आल्या की मला खूप मस्त वाटायचं. आपल्या नात्यात पण हे अवघड आणि खानदानी प्रकरण आहे याचं समाधान वाटायचं. पण तरी कधी नव्वारी नेसून बघण्याचा प्रयत्न केला नव्हता.

'जाणता राजा' नाटकात मी सामील झाले मग नव्वारी नेसायला शिकणं, नेसणं, नेसवणं हे ओघानेच आलं. मग कधी जाणता राजामधे लावण्या नाचता नाचता दोन एन्ट्र्यांच्यामधे घड्याळ लावून पाच मिनिटात घुंगरू, नव्वारी शालू उतरवून परत दुसरा शालू नेसून घुंगरू बांधून परत नाचायला तयार इत्यादीची प्रॅक्टीसही गरजेप्रमाणे करून झाली. नव्वारीमधला अवघड आणि गूढ पणा संपला. पण खानदानी पणा रूजून राह्यला.

पुढे नाटकसिनेमातलं कापडचोपड हाताळायच्या धंद्यात उतरायचं ठरवलं तेव्हा सगळ्याच वस्त्राभूषणांचा अभ्यास डोळसपणे सुरू केला. आणि आपल्या म्हणजे भारताच्या वेशभूषेच्या प्रवासाने मोहवून टाकलं.
लांबलचक कापड अंगावर वेगळ्या वेगळ्या जागी गुंडाळायच्या, लपेटायच्या केवढ्या त्या तर्‍हा, त्यातली कला, त्यातलं सौंदर्य, त्यातली उपयुक्तता सगळंच अचंबित करणारं होतं.

तिथे कुठेतरी हे ही ठळकपणे जाणवलं की अरे नव्वार हे काही साडीचे, नेसायच्या पद्धतीचे नाव नाहीच्चेय. ते साडीचे माप आहे केवळ. आणि मग आपसूक नव्वारीचा बोली भाषेतला संधी फोडून नउवारी असं म्हणायला सुरूवात झाली.

पुढे अभ्यासत जाताना जगभरातल्या इतर प्राचीन संस्कृतींमधील वेशभूषा आणि भारतीय वेशभूषा यांची नकळत तुलना होत असायची. प्राचीन ग्रीक, रोमन, असिरीयन, इजिप्शियन, बॅबिलोनियन इत्यादी सगळ्याच वेशभूषा आणि भारतीय वेशभूषेत साम्यस्थळं पण अनेक आढळली. प्राचीन रोमन वेशभूषेमधे तरूण स्त्रियांच्या डोक्यावर ओढणीसारखं काही असे डोकं झाकण्यासाठी त्याला 'पल्ला' म्हणतात ज्याचा आपल्याकडे अर्थ पदर असा होतो अश्या काही गमती सापडल्या.

सगळ्या प्राचीन युरोपियन व पर्शियन वेशभूषांच्यात मात्र सापडली नाही ती एक गोष्ट म्हणजे 'कासोटा' किंवा कपड्याचे 'दुटांगीकरण'.

प्राचीन भारताच्या बाकी भागात हे 'दुटांगीकरण' प्रकर्षाने दिसून येतेच. पण प्राचीन भारताचा विस्तार आत्ताच्या अफगाणिस्तानपर्यंत म्हणजे तेव्हाच्या गांधार देशापर्यंत मानला जातो. या गांधार देशात सुद्धा कपड्याचे 'दुटांगीकरण' अस्तित्वात असल्याचे भरपूर पुरावे मिळतात. हे 'दुटांगीकरण' बहुतांशी धोतर नेसल्यासारखे, एक पदर मागे कासोटा म्हणून नेणे आणि दुसर्‍या पदराचा पुढे पंखा करणे किंवा खरंच पदर म्हणून वापरणे असं दिसतं. किंवा धोतरासारखे दुटांगीकरण आणि दुसरे वेगळे वस्त्र वरचे शरीर झाकायला असं दिसून येतं. स्त्रिया व पुरूष दोघांच्याही अंगावर याच प्रकारचे 'दुटांगीकरण' दिसून येते.
गुप्त काळात मात्र (early 4th cent to mid 8th cent AD) आपल्याला आपल्या ओळखीची दुटांगी साडी दिसून येते. हिचे दुटांगीकरण हे धोतरापेक्षा वेगळे आहे आणि तेच कापड सलगपणे पदरापर्यंत गेलेले आहे. तेही अजंठाच्या लेण्यात म्हणजे आपल्याच महाराष्ट्रात. आता ही साडी खरोखरच नऊवारी होती की नाही ते मात्र सांगणं कठीण आहे. पण त्या गूढ, अवघड आणि खानदानी प्रकाराचा पहिला बिंदू हा धरायला हरकत नाही.

ही पद्धत नक्की कशी आहे याचं गूढ अनेकांना असेलच त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात म्हणजे आपल्या नेहमीच्या साडीसारखीच सुरूवात करायची. पण साडीची लांबी मोठी असल्याने ज्या भरपूर निर्‍या येतात त्यांचा मध्य काढून तो दोन पायांच्या मधून मागे नेऊन कमरेपाशी खोचायचा. झाली बेसिक पद्धत. कमरेशी खोचताना निर्‍यांची दिशा मात्र आपल्या नेहमीच्या साडीपेक्षा उलटी ठेवायची, पदराची एक कड उजव्या खांद्याच्याखालून तर दुसरी कड गुढघ्याच्या खालून डाव्या खांद्याकडे यायला हवी, पदर खूप मोठा काढायचा नाही, पदर मागे एका रेषेत असता कामा नये तर तो दोन खांद्यावर/ डोक्यावर घेतल्यावर मागे एक समान पातळीवर यायला हवा अशी काही महत्वाची पथ्य पाळायला शिकलं की बास.

याच साडीचा उजव्या पायावरचा घोळ उचलून डाव्या बाजूला कमरेपाशी खोचून पंखा तयार केला आणि पदर केवळ दोन्ही खांद्यावरूनच घेतला की झाली ब्राह्मणी नऊवारी.

दोन्ही पायांवर साडी चापूनचोपून घट्ट बसवली आणि मागच्या काष्ट्याला दोन्ही काठ एकाला एक लावून बसवले की झाली नाचकामाची साडी.

दोन्ही पायांवरून घोळ उचलून त्या त्या बाजूला कमरेपाशी खोचले आणि पदर डाव्या खांद्यावरून मग डोक्यावरून आणि मग उजव्या खांद्याच्या खालून नेऊन कमरेशी टोक खोचलं की झाली कामकरी, शेतकरी बाई.

एक मोठा वेढा साडीच्या आत घडी घालून घेऊन मग निर्या आणि काष्टा घालायचा, दोन्ही पायावरचा घोळ किंचितसा उचलून कमरेशी खोचायचा. क्युलॉटस सारखी पोटर्‍यांपर्यंत साडी नेसायची. ही झाली सिंधुदुर्गातल्या ख्रिश्चन बायांची साडी.

वेगवेगळ्या पद्धतीने पायावरचा घोळ आटवून त्याचे मोठ्ठे खिसे करायचे, साडी अगदीच शॉर्टस च्या उंचीची होते. ही झाली गोवा आणि सिंधुदुर्गातल्या भागातली कामकरी लोकांची भातलावणीच्या वेळी, डोंगरात काम करतेवेळी नेसायची साडी.

या सगळ्या नेसण्यांमधे समान आहे ते म्हणजे साडीच्या एका टोकापासून सुरूवात करणे, कमरेभोवती गाठ मारून त्यावर साडी तोलणे आणि निर्‍या दुंभगून दुटांगीकरण करणे.

पण याबरोबरच नऊवारच साडी पण निर्‍या, गाठी असं काही न करता एकावर एक बरेच वेढे घेऊन नेसायच्याही काही पद्धती आहेत. सुरूवातीलाच काष्ट्यासाठी चांगला लांबलचक भाग ठेऊन द्यायचा आणि खूप सारे वेढे घ्यायचे. सगळे वेढे घेऊन संपल्यावर आतमधे काष्ट्यासाठीचा भाग दोन पायांतून मागे नेऊन सगळ्या वेढ्यांच्या वरून मागे कमरेशी खोचायचा अशी साधारण पद्धत. पदरासकटचे आणि पदराशिवायचे असे दोन्ही प्रकार यात दिसतात. ठाणे जिल्ह्यातले वारली आदीवासी, रायगडातले कातकरी आणि ठाकर आदीवासी, मुंबईच्या कोळणी, मुंबईतलाच आगरी समाज, रत्नागिरीतला कुणबी समाज, सिंधुदुर्गातला आणि गोव्यातला धनगर समाज अश्यांच्या साडी नेसायच्या पद्धती या दुसर्‍या पद्धतीत येतात.

भारतातलं विशेषतः मध्यभारतापासून दक्षिणेकडे हवामान उष्ण त्यामुळे अंगावरचं कापड चोपड हे हवा खेळती राहील असं हवं. आणि एकावर एक थर नसलेलं हवं यातूनच मोठ्या कापडाची एकच साडी दुटांगी करून नेसायच्या पद्धतीने जन्म घेतला असणार. एका नऊवार कापडामधे संपूर्ण शरीर झाकलं जातं तरीही दुटांगीकरण केल्यामुळे कसंही वावरायला, बसाउठायला काहीच प्रॉब्लेम नाही, काष्टा हा सगळ्या वेढ्यांच्या/ थराच्या वर असतो त्यामुळे नैसर्गिक विधींच्यासाठीही संपूर्ण साडी सोडायची गरज नाही. आणि शरीर झाकलं तरी शरीराची सगळी वळणं बरोब्बर अधोरेखित केली जातात. त्यामुळे स्त्री शरीराची कमनीयता, सौंदर्यही दिसून येते.

तसंच त्या त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, कामधंदे इत्यादीचा विचारही त्या त्या नेसणीमधे दिसतो. कोकणामधे चिखल, पाणी जास्त त्यामुळे तिथल्या सगळ्याच पद्धतींमधे साड्या ह्या पायघोळ नाहीत. घोट्याच्या वरती किंवा क्वचित गुडघ्याच्या वरतीही जाणार्‍य पद्धती दिसतात. तसंच डोंगरदर्‍यांमधल्या बिकट वाटांशी दोन हात करत रोजचं जगणं जगायचं असल्याने कातकरी, धनगरी पद्धतींमधे कमरेभोवती बरेच वेढे घेऊन पाठीला आधार दिलेला दिसतो.

हे असं सगळं अभ्यासायला लागलं की पूर्वजांच्या बुद्धीबद्दलचा आदर वाढतो. त्यांचं निसर्गाशी समजून उमजून जगणं उलगडायला लागतं समोर. साड्या, त्यांचे तपशील हा एक भाग झाला पण निसर्गाशी पूर्वजांनी टिकवून ठेवलेलं नातं आपण जपायला पाहीजे असं कुठंतरी जाणवायला लागतं. काय म्हणता?

-नी

Search This Blog